त्रिवेणी
त्रिवेणी हा कवितेचा नविन आकृतिबंध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार - दिग्दर्शक गुलजार ह्यांनी निर्माण केला आहे. हिंदी साहित्यिक कमलेश्वर 1972-73 साली सारिका ह्या हिंदी मासिकाचे संपादक होते. त्यावेळी त्यांनी गुलज़ार ह्यांनी लिहिलेल्या अनेक त्रिवेणी सारिका मधून प्रकाशित केल्या. त्या नंतरही गुलजार ह्यांनी वेळोवेळी त्रिवेणी हा आकृतीबंध अभिव्यक्तीसाठी वापरला. कोणत्याही भारतीय भाषांतील कवितेत हा रचनाबंध नाही. त्रिवेणी ही गुलजार ह्यांची कवितेला देणगीच होय!
त्रिवेणीचा आकृतिबंध साधा-सरळ अन् सोप्पा आहे, अल्पाक्षरी अन् फक्त तीन ओळींचा. पहिल्या दोन ओळी गजलच्या कोणत्याही एखाद्या शेराप्रमाणेच आहेत, अनुभवाची पूर्ण अभिव्यक्ती होते त्यात. मात्र त्या दोन ओळींना अलगद अजून एक ओळ येऊन मिळते. ही तिसरी ओळ जरा शेंडेफळासारखी खटयाळ आहे (-पण वाह्यात मात्र नाही). तिसऱ्या ओळीच्या येण्याने आधीच्या दोन ओळींतील अर्थाला एक नविनच परिमाण मिळते. आधीचा अर्थ बदलतो किंवा त्यात अजून काही अर्थांचे पदर येऊन मिसळतात. (परंतु अर्थाचा अनर्थ मात्र होत नाही). त्रिवेणी मधील पहिल्या दोन ओळींमध्ये गंगा-यमुनेप्रमाणे संगम होतो, अर्थाने काठोकाठ भरलेल्या असतात त्या दोन्ही ओळी. पण ह्या दोन प्रवाहांखालून आणखी एक नदी वाहत असते, तिचे नाव आहे सरस्वती - पण ती लुप्त आहे. डोळयांना दिसत नाही. पण आधीच्या दोन ओळींतील प्रवाहाच्या ओघाची लय पकडून सरस्वती (तिसरी ओळ) प्रकटते आणि त्रिवेणी परिपूर्ण होते!
त्रिवेणी मधील तिसऱ्या ओळीत खटयाळ (क्वचित् अवखळ) भाव विशेषत्वाने आहे. त्रिवेणी मधील पहिल्या दोन ओळींत कवीची कविता अभिव्यक्त होते तर तिसऱ्या ओळीत त्याच कवितेवर त्याचाच आतला आवाज भाष्य करतो!!!
गुलजार जरी उर्दू शायर असले आणि मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत वावरत असले तरी ते पंजाब प्रांतातून आलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात पंजाबीयत (दिलदारी, शोखी, खुलापन) आहे. त्यांच्या अनेक कलाकृतींतून त्यांची पंजाबीयत ठळकपणे व्यक्त झालेली आहे. त्रिवेणी ह्या आकृतिबंधामध्ये अभिव्यक्त होताना गुलज़ार ह्यांचे हे काही विविध पैलू त्यांच्या मूळ कविप्रकृतीसोबतच ठळकपणे प्रकट झाले आहेत.
मी गुलजार ह्यांच्या त्रिवेणी 1987-88 मध्ये प्रथम वाचल्या अन् प्रभावित होऊन लगोलग एक-दोन लिहिल्याही. मात्र जीवनाच्या इतर प्रवाहात त्रिवेणी मधील त्या सरस्वतीचा प्रवाह गुप्त झाला. पण 2007 च्या अखेरीस तो प्रवाह खळाळत येऊन मला आकंठ भिजवू लागला. अर्थांचे नानाविध पदर शोधण्याचा छंद मनास होता, कोणत्याही बाबीचे नानाविध पैलू पडताळण्याची आस असल्याने कॅलिडोस्कोप हे खेळणे पूर्वीपासून आवडत होते, दरम्यानच्या काळात जगण्याचे - माणसांचे देखील अनेकविध कंगोरे सामोरे आले आणि साहिर लुधियानवी (पुन्हा एक उर्दू पण पंजाबचा कवि) ह्यांच्या लेखनाचा प्रभाव....... ह्या साऱ्या-साऱ्याची गोळाबेरीज म्हणून काही त्रिवेणी कागदावर उतरल्या..
rrp
मांडतो कैफियत पूरेपूर
दोनच ओळींचा गजलचा शेर
त्रिवेणी करी आशयात फारफेर!
rrp
- संदीप मसहूर
No comments:
Post a Comment